Sun Apr 06 2025 12:06:16 AM
  • Follow us on
  • Subcribe

अंतराळातून भारताचे अद्भुत दर्शन : सुनीता विल्यम्स

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 3 d ago
नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर
नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर

 

नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरून पृथ्वीवर परतले. अंतराळातून परतल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून भारताचे वर्णन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, अंतराळातून भारत पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता आणि विशेषतः हिमालयाचे दर्शन थक्क करणारे होते. 

सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "अंतराळातून भारत खरोखरच अद्भुत दिसतो. आम्ही हिमालयावरून गेलो, तेव्हा बुच यांनी तिथली अप्रतिम छायाचित्रे टिपली. हिमालयाचे विशाल रूप आणि त्याच्या खालून वाहणाऱ्या नद्या पाहून असे वाटत होते की, आपण भारताच्या हृदयातून प्रवास करत आहोत. भारत हा बहुरंगी देश आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना किनाऱ्यावर दिसणाऱ्या मासेमारीच्या नौका मुंबई आणि गुजरातची ओळख करून देतात. रात्रीच्या वेळी मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत प्रकाशाचा एक जाळे पसरलेले दिसते.”

हिमालयाचे वैशिष्ट्य आणि भारताचे सौंदर्य
सुनीता यांनी हिमालयाला भारताच्या सौंदर्याचा कळसाध्याय मानले. त्यांनी सांगितले की, अंतराळातून पाहिलेला हिमालय आणि भारताचा नकाशा त्यांच्या मनावर कायमचा ठसा उमटवून गेला आहे. त्यांच्या या वर्णनाने भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत यानातून अंतराळातून भारत पाहिल्यानंतर व्यक्त केलेल्या भावनांची आठवण करून दिली. राकेश शर्मा यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना "सारे जहाँ से अच्छा" असे वर्णन करत भारताचे सौंदर्य अधोरेखित केले होते. सुनीता यांचे हे वक्तव्यही तितकेच भावनिक आणि प्रेरणादायी आहे.

भारताला भेट देण्याची उत्सुकता
पत्रकार परिषदेत सुनीता विल्यम्स यांना भारताला भेट देण्याबाबत आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी (इस्रो) सहकार्य करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर त्या म्हणाल्या, "माझ्या वडिलांचा मायदेश असलेल्या भारतात मी नक्कीच भेट देणार आहे. मला ‘अक्सिओम मिशन ४’ (एएक्स-४) मधील भारतीय अंतराळवीरांना भेटण्याची खूप उत्सुकता आहे. त्यांच्याशी संवाद साधून आणि भारतातील जास्तीत जास्त लोकांसमोर माझे अनुभव मांडायला मला आवडेल. भारत हा एक महान देश आणि मजबूत लोकशाही आहे. अंतराळ क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा भारताचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. आम्हाला भारताचा भाग बनून त्यांच्या प्रगतीत हातभार लावायला आवडेल."

सुनीता विल्यम्स यांचे हे वक्तव्य भारताच्या अंतराळ संशोधनातील प्रगती आणि त्यांच्या मूळ देशाबद्दलच्या प्रेमाचे द्योतक आहे. त्यांनी व्यक्त केलेली भारताला भेट देण्याची आणि इस्रोशी सहकार्य करण्याची इच्छा भारतीय अंतराळ संशोधनाला नवी प्रेरणा देऊ शकते. त्यांचा हा अनुभव आणि उत्साह भारतीय तरुणांना अंतराळ क्षेत्रात करिअर करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित करेल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter