आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आजून पण भारतात आला नाही. शनिवारी बार्बाडोस येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने ट्रॉफी जिंकली.
या सामन्यापासून भारतीय संघ खराब हवामान आणि चक्रीवादळामुळे बार्बाडोसमधील हॉटेलमध्ये अडकला होता. पण आता हवामान पूर्वीपेक्षा चांगले आहे. त्यामुळे टीम इंडिया लवकर भारतात ट्रॉफी घेऊन भारतात येणार आहे.
भारतीय संघातील खेळाडूंसाठी बीसीसीआयने चार्टर्ड विमानाची सोय केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेळाडूंना घेऊन जाणारे विमान मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता उड्डाण करेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे देखील भारतीय संघासोबत आहेत. संपूर्ण भारतीय तुकडी घेऊन बार्बाडोसहून एक विशेष चार्टर्ड विमान बुधवारी संध्याकाळी 7.45 वाजता दिल्लीला पोहोचेल.
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून भारतीय चाहते आपल्या चॅम्पियन संघाची वाट पाहत आहेत. रविवारी संध्याकाळपासून खराब हवामानामुळे सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या बार्बाडोसमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते.
सोमवारी, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया अमोर मोटली यांनी सांगितले की, पुढील 12 तासांत विमानतळ पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला होता.