यंदाच्या टी20 वर्ल्ड कप मध्ये क्रिकेट प्रेमींना अनेक रोमहर्षक लढती पहायला मिळाल्या.काल भारत विरुद्ध इंग्लंड असा सेमीफायनल मुकाबला खेळवला गेला. यामध्ये गत विजेत्या इंग्लंडचा दारुण पराभव करत भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दावेदारी लावली आहे. तब्बल १० वर्षांनी भारताने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे संपूर्ण देशातून भारतीय संघावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोण कोण भारताच्या विजयाचे शिल्पकार आहेत हे आपण जाणून घेवूयात
सेमी फायनलच्या सामन्यावर पावसाचे सावट आणि खराब सुरुवात होऊन देखील टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या ५७ आणि सूर्यकुमार यादव याच्या ४७ आणि हार्दिकच्या २३ धावांच्या जोरावर ७ विकेट्स गमावून २० ओव्हरमध्ये १७१ धावांपर्यंत मजल मारली.
इंग्लंडने टॉस जिकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्याला प्रतिसाद देत भारताने खेळपट्टीला साजेसा खेळ केला. १७१ धावांचा पाठलाग करताना कुलदीप आणि अक्षराच्या जोडीने आपल्या फिरकीने प्रत्येकी ३ विकेट्स घेत अक्षरशः इंग्रजांचे कंबरडे मोडले. हॅरी ब्रुकच्या २५ तर जोफ्रा आर्चरच्या २१ धावांच्या जिवावर इंग्लंडचा संघ अवघ्या १०३ धावांवर गारद झाला आणि भारताने ६८ धावांनी पराभव करत इतिहास रचला. इंग्लंडकडून जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.