नाबाद द्विशतकी खेळी करत सरफराजने रचला विक्रम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इरानी कप स्पर्धेला मुंबई संघाने धमाकेदार सुरूवात केली. शेष भारत विरूद्धच्या पहिल्याच डावात मुंबईने ५३७ धावांचा डोंगर उभा केला. ज्यामध्ये सर्फराज खानने मुंबई संघासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी द्विशतकी खेळी केली. कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाच्या घरंगळणारी खेळी सावरली व मोठी खेळी करत नवा टोन सेट करून दिला. तर श्रेयश अय्यर आणि तनुष कोटियननेही डावात अर्धशतक झळकावले.

मुंबईच्या डावाला थोडीशी खराब सुरूवात झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे स्वस्तात परतले. तर यष्टीरक्षक हार्दिक तमोरेच्या शून्यावर परतला. ३७ धावांवर ३ विकेट अशी मुंबईची बिकट परिस्थिती असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईचा डाव सावरण्यास सुरूवात केली. त्याला श्रेयश अय्यरची साथ मिळाली. दोघांनी १७० चेंडूत १०२ धावांची भागिदारी केली. पुढे श्रेयश अय्यर ५७ धावांवरती परतला. पण पुढे फलंदाजीसाठी आलेल्या सर्फराजने मुंबईचे धावफळक धावतेच ठेवले. रहाणे आणि सर्फराजने मुंबईसाठी १३० धावांची मोठी भागिदारी केली.

रहाणे शतकापासून ३ धावा दूर असताना यश दयालच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला आणि रहाणेचे शतक थोडक्यात हूकले. रहाणेने या खेळीदरम्यान ७ चौकार व १ षटकारांसह एकूण ९७ धावा जोडल्या. कर्णधार परतल्यावर सर्फराजने तनुष कोटियनला साथीला घेतले आणि मुंबईची फलंदाजी त्याच आक्रमकतेने सुरू ठेवली.

तनुष कोटियननेही १२८ चेंडूत ६४ धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर सर्फराज खानने २८६ चेंडूत २२२ धावांची द्विशतकी खेळी करत मुंबईकडून खेळताना नवा विक्रम रचला. सर्फराज खान मुंबई संघासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सर्फराजने या खेळीदरम्यान तब्बल २५ चौकार व ४ षटकार ठोकले.

सुरूवातीला जलद विकेट्स गमवलेल्या आपला पहिला डाव तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला संपवला. पहिल्याच डावात मुंबईने तब्बल ५३७ धावा उभारल्या.

शेष भारत संघाच्या डावाला सुरूवात झाली असून मुंबईच्या जुनैद खानने कर्णधार ऋतुराजला अवघ्या ९ धावांवर माघारी पाठवले. तर दुसरीकडे अभिमन्यू ईश्वरन आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले आहे. ईश्वरन ७१ चेंडूत ५७ धावा करत नाबाद आहे. तिसऱ्या क्रमांकावर आलेला साई सुदर्शन २१ धावांवरती खेळत आहे.