भारतीय संघ पुढल्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का, याचे उत्तर सापडणे अवघड झाले आहे. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) टीम इंडियाला देशात खेळवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्यांच्याकडून आयसीसी, बीसीसीआय यांच्याकडे विनंती अर्ज गेले आहेतच,तर त्यांनी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशीही याबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न झाला. हाती आलेल्या वृत्तानुसार PCB ने बीसीसीआयला पत्र लिहिले आहे आणि त्यात अजब प्रस्ताव ठेवला आहे.
भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाण्यास तयार नाही आणि यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने BCCI ला पत्र लिहून तोडगा काढला आहे. भारतीय संघाने प्रत्येक सामन्यानंतर चंदीगड किंवा नवी दिल्ली येथे जाण्याची तयारी दर्शवली, तर त्यासाठी संपूर्ण मदत करू, असे पीसीबीने म्हटले आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेतील सामने लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथे होणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पीसीबीने भारताच्या सर्व सामन्यांचे नियोजन लाहोरमध्ये केले आहे. लाहोर भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ आहे आणि सामना पाहण्यासाठी येणाऱ्या भारतीय चाहत्यांसाठीही ते सुलभ असेल.
भारताचे तीन सामने २० फेब्रुवारी ( वि. बांग्लादेश), २३ फेब्रुवारी ( वि. पाकिस्तान) आणि २ मार्च ( वि. न्यूझीलंड ) असे होणार आहेत. पण, ब्रॉडकास्टरने भारत-न्यूझीलंडचा सामना वेगळ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली आहे. पीसीबीने पर्याय म्हणून रावळपिंडीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण, ब्रॉडकास्टर आणि आयसीसी यांनी अशा विनंतीचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, भारत हा स्पर्धेत खेळणे महत्त्वाचे आणि यावर तोडगा निघेल असा विश्वास इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB)व्यक्त केला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter