इंग्लंडमध्ये सध्या वर्ल्ड चॅम्पिअन्स ऑफ लेजंड सामना सुरु आहे. या सामन्यातील सेमी-फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली गेली. ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात पठाण बंधुनी केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला ८६ धावांनी पराभूत केले. कॅप्टन युवराज सिंह आणि रॉबिन उथप्पा यांनी अर्धशतकी खेळी करत इंडिया चॅम्पियन्स टीमला वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यास मदत केली.
इंडिया चॅम्पियन्सने २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून २५४ धावा केल्या. टीम इंडियाकडून रॉबिन उथप्पा, युवराज सिंह, इरफान पठाण आणि युसूफ पठाण या चौघांनी अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पीटर सीडलने 4 विकेट्स घेतल्या. तर कुल्टर नाईल आणि झेवियर डोहर्टी या दोघांना १-१ विकेट मिळाली. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने संघाने २० ओव्हरमध्ये केवळ १६८ धावा करत ७ विकेट गमावल्या. त्यामुळे सेमी- फायनल स्पर्धेतून ब्रेट लीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया बाहेर गेली आहे. अंतिम सामना १३ जुलै रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे.
पठाण बंधूंनी उडवल्या कांगारुंच्या बॉलिंगच्या चिंधड्या
इंडियाकडून रॉबिन उथप्पा याने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. उथप्पाने १८५.७१ च्या स्ट्राईक रेटने ३५ बॉलमध्ये ४ फोर आणि ४ सिक्सच्या मदतीने ही खेळी केली. कॅप्टन युवराज सिंगने २८ चेंडूत २१०.७१ च्या स्ट्राईक रेटने ५ षटकार आणि ४ चौकारांसह ५९ धावा केल्या. त्यानंतर पठाण बंधूंनी कांगारुंच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवल्या.
दोघांनी विस्फोटक खेळी करत वादळी अर्धशतक ठोकलं. इरफान-युसूफने पाचव्या विकेटसाठी ३६ बॉलमध्ये ९५ धावांची भागीदारी केली. इरफानने १९ बॉलमध्ये ३ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तर यूसुफ २३ बॉलमध्ये ४ सिक्स आणि तेवढयाच फोरच्या मदतीने ५१ रन्सवर नॉट आऊट राहिला.