सुजात अली कादरी
भारत आणि इराण एकाच सांस्कृतिक नाळेने जोडले गेले आहेत. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध शतकानुशतकांच्या संकटांना पुरून उरले आहेत. मध्ययुगीन काळातील उलथापालथ असो किंवा आधुनिक काळातील मध्य पूर्वेतील सततचे संघर्ष असोत, या दोन प्राचीन देशांमधील प्रेमाची ऊब कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला सैयद अली खामेनेई यांच्या अलीकडील वादग्रस्त विधानामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या वक्तव्यात त्यांनी भारताला इस्रायल आणि म्यानमारसह मुस्लिमांचा छळ करणारा देश म्हणून संबोधले. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशिया विषयाचे तज्ज्ञ आणि शांततेचे समर्थन करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
अली खामेनेई यांच्या विधानामागे काय कारण होते? त्यांचा पूर्वेतिहास बघता असे दिसते की त्यांना स्थानिक ते आंतरराष्ट्रीय अशा प्रत्येक मुद्द्यावर अधिकारवाणीने एकारलेली विधाने करण्याची सवयच आहे. जी एका धर्मगुरुच्या सवयीला साजेशी म्हणावी अशीच आहे. सर्वोच्च नेत्याच्या अशा विधानांपासून अंतर ठेवताना लोकशाही प्रक्रियेने निवडलेले प्रतिनिधी आणि प्रशिक्षित नागरी सेवक यांच्या नेतृत्वाखालील इराणी सरकारला अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते.
इराणी सरकार आपल्या सर्वोच्च नेत्यावर टीका करण्याचे टाळते, मात्र त्यांच्या बेताल वक्तव्याने दुखावल्या गेलेल्या मित्र राष्ट्राची समजूत काढताना राजदूतांची आणि अधिकाऱ्यांची मोठी दमछाक होते. भारताच्या बाबतीतही असे अनेक वेळा घडले आहे. खामेनेई यांच्यापूर्वी सर्वोच्चपदी असणारे आयातुल्ला खोमेनी आणि खामेनेई यांनीही १९८० आणि १९९० च्या दशकात 'भारतामध्ये मुस्लिम धोक्यात आहेत' अशी विधाने केली होती.त्यानंतर इराणी मुत्सद्यांना तत्काळ भारताला स्पष्टीकरण द्यावे लागले जेणेकरून दोन्ही देशांमधील संबंधांत कोणताही अडथळा येऊ नये, आणि स्थानिक किंवा जागतिक मुस्लिम समुदायांना उद्देशून केलेल्या विधानांचा परिणाम संबंधांवर होऊ नये. त्यामुळे भारत आणि इराण यांचे संबंध दोन्ही बाजूंनी वेळेवर झालेल्या संवादामुळे अखंड राहिले आहेत.
तथापि, खामेनेई आणि त्यांच्या कट्टर समर्थकांना हे स्मरण करणे उचित ठरेल की त्यांच्या विधानांचा वास्तविकतेच्या पार्श्वभूमीवर किती आधारहीन आणि चुकीचा अर्थ आहे. भारतातील मुस्लिम, अगदी इराणी मिशनशी संबंधित लोक सुद्धा, पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेतात. इराणच्या विपरीत, त्यांना संपूर्ण लोकशाही हक्क प्राप्त आहेत. भारतीय मुस्लिमांपुढे काही गंभीर स्वरूपाच्या समस्या आहेत, यात शंका नाही, परंतु ते धैर्याने त्या समस्यांचा सामना करत आहेत आणि लोकशाही व घटनात्मक मार्गांवर त्यांचा विश्वास अढळ आहे.
जेव्हा खामेनेई यांनी हे विधान केले, तेव्हा, वरकरणी सोमवारी, इराणच्या सांस्कृतिक संस्थेने – इराण सांस्कृतिक भवन – आपल्या ईद मिलाद-उन-नबी (प्रेषित मुहम्मद यांच्या जयंती उत्सव) च्या मोठ्या साजरीकरणाच्या तयारीत कुराण पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भारतभरात ईद मिलाद मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली आणि राज्य सरकारांनी मिरवणुका निर्बाधपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सहाय्य दिले. इराण हा भारतात औपचारिक सांस्कृतिक मिशन सुरू करणारा पहिला देश होता. इराण सांस्कृतिक भवन हे दिल्लीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले कोणत्याही परदेशी देशाचे पहिले सांस्कृतिक भवन होते. सुरुवातीपासूनच ते खूप सक्रिय राहिले आहे, आणि केंद्राच्या ८० वर्षांच्या प्रयत्नांमुळे अनेक उपयुक्त यश मिळाले आहेत. उदाहरणार्थ, 'कंद-ए-पारसी' मासिक, जे पर्शियन रिसर्च सेंटर, इराण सांस्कृतिक भवनाद्वारे प्रकाशित होते, हे इराणबाहेरील सर्वात प्रतिष्ठित पर्शियन भाषा मासिक आहे. ते सलग सुमारे ४० वर्षांपासून प्रकाशित होत आहे. तर इराण सांस्कृतिक भवन हे दोन देशांमधील विविध संस्थांमध्ये सांस्कृतिक आणि साहित्यिक संबंध प्रस्थापित करण्याचे केंद्र म्हणून कार्य करत आहे.
अत्यंत उत्साही असलेल्या इराण संस्कृती भवनामार्फत लोकांना इराण आणि भारताबद्दलची समज वाढवण्यासाठी चर्चासत्रे आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील प्रत्येक स्तरातील लोक या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. अनेक वेळा अशा व्यक्तींचा इराणी मिशनकडून सत्कारही केला जातो. अशा प्रसंगी इराणमधील वक्ते हे भारत जगातील सर्वात मैत्रीपूर्ण आणि शांतताप्रिय देश असल्याचे पुन्हा पुन्हा सांगतात. कदाचित, इराणी मिशनने अशा कार्यक्रमांचे तपशील त्यांच्या सर्वोच्च नेत्यांच्या कार्यालयाकडे पाठवायला हवे.
इराण सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित केलेल्या वार्षिक पर्शियन भाषा वर्गांमध्ये आणि इतर कोर्सेसमध्ये कैक भारतीयांनी भाग घेतला आहे. ते मुसलमानांविरुद्ध कोणतीही भेदभावाची भावना दर्शवत नाहीत. भारतीय सरकार भारतीय विद्यापीठांमध्ये 140 पर्शियन भाषा शिक्षण गटांना समर्थन देत आहे, आणि भारतीय संसदने २०२० मध्ये पर्शियनला भारताच्या शास्त्रीय भाषांपैकी एक मान्यता दिली आहे.
तसेच, भारतीयांच्या शिष्टमंडळांना दरवर्षी इराण दौऱ्यावर पाठवले जाते आणि त्यांना इराणच्या अधिकाऱ्यांशी परिचय करून दिला जातो, ज्यांपैकी अनेक खामेनी यांच्या जवळचे असतात. अशा शिष्टमंडळाचा भाग असलेले लोक सांगतात की हे सर्व इराणी मान्यवर भारत प्रत्येक भारतीयासाठी पूर्णत: लोकशाही देश असल्याचे हमी देतात.
भारतात, काही महिन्यांच्या अंतराने एखादे राज्य निवडणुका लढवते. इतरांप्रमाणेच मुस्लिमही या निवडणुकांमध्ये समानतेने भाग घेतात. त्यांना त्यांच्याच पक्षांकडून योग्य वाटा मिळवताना काही अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु त्यांचे लोकशाही हक्क कोणापेक्षा कमी नाहीत. अलीकडेच, इराण BRICS गटाचा एक भाग बनला. भारताच्या समर्थनामुळे इराणी नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दिवंगत इराणी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी भारताचे वेळेवर दिलेल्या समर्थनाबद्दल उघडपणे आभार मानले. भारताने आंतरराष्ट्रीय निर्बंध बाजूला ठेवून इराणी तेल खरेदी केले आहे जेणेकरून संकटग्रस्त इराणी अर्थव्यवस्था सावरण्यास मदत होईल.
अशा मैत्रीपूर्ण पार्श्वभूमीमुळे भारत-इराण मैत्री अधिक मजबूत करण्याची संधी आहे. सर्वोच्च नेत्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे, आणि जर त्यांच्या विधानांमध्ये काही चूक असेल, तर त्यांनी सुधारणा करण्यास संकोच करू नये.
संस्कृत, हिंदी, उर्दू आणि इराणी भाषेतील पारंपारिक भारत-इराण साहित्याने या दोन महान देशांना जागतिक शांततेचे अग्रदूत म्हणून दर्शवले आहे. या दिशेने परस्पर सहकार्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेतला पाहिजे.
इराणी आणि भारतीय विचारवंतांनी जगातील लोकांना शांतता, मैत्री, स्थिरता, दयाळूपणा आणि परस्पर आदर यासाठी आमंत्रित करणाऱ्या उत्कृष्ट ओळी फारसी भाषेत लिहिल्या आहेत. या मुद्द्यावर भर देण्यासाठी भारतीय शास्त्रीय कवी अब्दुल कादिर बेदिल देहलवी यांच्या ओळी उद्धृत करता येतील: ओ बेदिल! स्वभावातील फरक त्यांच्या कपड्यांच्या बाह्य स्वरूपात आहे, अन्यथा जर आपण बारकाईने पाहिले, तर मोर आणि कावळ्याच्या शिरांतील रक्ताचा रंग एकच आहे.
फारसी साहित्य अशा ओळींनी भरलेले आहे जे या उद्दिष्टाला उत्साहाने पुढे नेतात, जसे की इराणचे महान सूफी कवी शेख सादी शिराझी यांच्या या ओळींमध्ये प्रतिबिंबित होते:
"मनुष्यप्राणी एकत्रित अविभाज्य घटक आहेत,
ते एकाच सार आणि आत्म्याने निर्माण झाले आहेत.
जर एक घटक दुःखाने ग्रस्त असेल,
तर इतर घटक अस्वस्थ राहतील.
जर तुम्हाला मानवी दुःखाबद्दल सहानुभूती नसेल,
तर तुम्ही स्वतःला माणूस म्हणवू शकत नाही."
-सुजात अली कादरी