मुस्लिमांच्या सामाजिक उन्नतीसाठी कटिबद्ध असलेला लोकराजा

Story by  Mateen Shaikh | Published by  sameer shaikh • 1 Years ago
छत्रपती शाहू आणि मुस्लीम बोर्डिंग, कोल्हापूर
छत्रपती शाहू आणि मुस्लीम बोर्डिंग, कोल्हापूर

 

नुकताच कोल्हापूरने भुतोनभविष्यती असा धार्मिक तणाव अनुभवला. कोल्हापूरकरांना आपल्या संस्कृतीचा आणि शाहूंच्या आदर्शाचा विसर पडला की काय असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. आज २६ जून. छत्रपती शाहू महाराजांची १४९ वी जयंती. राजर्षी शाहू आणि त्यांच्या पुरोगामी, सर्वधर्मसमन्वयाच्या भूमिकेचा जागर करण्याची हीच खरी वेळ. यानिमित्ताने,  मुस्लीम समाजाच्या विकासासाठी शाहू महाराजांनी घेतलेल्या मूलगामी निर्णयांपैकी काहींची उजळणी करणारा आणि त्यामागचा महाराजांचा दृष्टीकोन समजावून सांगणारा हा लेख...   
 
राजसत्ता ही धर्म, जात, वंश, सीमा, भाषा यांच्या राजकारणावर आधारलेली असल्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. मात्र याला अपवाद ठरेल अशी एका राजाची 'राजसत्ता' नव्हे तर 'लोकसत्ता' अस्तित्वात होती. ही लोकसत्ता म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाची आदर्श लोकसत्ता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती जमातींना एकत्र घेत रयतेचे स्वराज्य निर्माण केले; त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत शाहू महाराजांनी राजेशाहीत लोकशाही मुल्ये रुजवून कल्याणकारी राज्य निर्माण केले.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे राजे नव्हते. ते सर्व जाती-धर्माच्या लोकांचे ते राजे होते. सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या भल्याचे स्वराज्य त्यांनी उभारले. त्याच स्वराज्याची रेषा छत्रपती शाहूंनी पुढे लांबवली. दीन दलितांना, अल्पसंख्यांकांना, सर्व जाती धर्मीयांना शाहू महाराजांनी आपलं मानलं. मुस्लिम समाजाविषयीही त्यांनी विशेष आस्था दाखवल्याचे दिसून येते. हिंदू आणि मुस्लिम हे एकाच राष्ट्राचे भिन्नभिन्न अवयव आहेत,असे ते म्हणत. हिंदू व मुस्लिम समाजात परस्परांविषयी विश्वासाची व समंजस्याची भावना रहावी, अशी शाहू महाराजांची कायम इच्छा होती. जाहीर भाषणांमधूनही त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला.

बहुजनांच्या मुलांनी शिक्षण घेतले तरच ते मूळ प्रवाहात येतील व स्वतः समाजातील दारिद्र्य दूर करतील, असा विचार शाहू महाराजांनी वेळोवेळी मांडला. संस्थानातील विविध जाती-समूहामध्ये शिक्षणासंबंधी गोडी निर्माण व्हावी असा त्यांचा प्रयत्न असायचा. 1902मध्ये महाराज इंग्लंडच्या दौऱ्यावरून सुखरूप परतले. त्याप्रित्यर्थ कोल्हापुरमधील मुस्लिम बांधवांनी एक समारंभ आयोजित केला होता. मुस्लिम पुढार्‍यांनी समाजाच्या शिक्षणासाठी जनजागृती चळवळ उभारावी, शैक्षणिक संस्था स्थापन कराव्यात. या कामी दरबाराकडून त्यांना पूर्ण सहाय्यता मिळेल असे आश्वासन शाहू महाराजांनी यावेळी दिले होते. त्या काळात मुस्लिम समाजात शिक्षणाविषयी कमालीची अनास्था होती. त्यामुळे महाराजांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मात्र महाराज शांत बसले नाहीत. मुस्लिम समाजातील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना त्यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश देऊन संस्थानातील मुस्लिमांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. या विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावचा शेख महंमद युनुस अब्दुल्ला हा एक विद्यार्थी होता. हा पुढे राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाल्यावर त्यास महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. मुस्लिम समाजात शिक्षणाची गोडी लावण्याचे काम महाराजांनी त्यांच्यावरच सोपवले. 1906 मध्ये शाहू महाराजांनी पुढाकार घेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावली व मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष बनले आणि आणि युसूफ अब्दुल्लांना कार्यवाह बनवले.

शाहू महाराजांनी विविध समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह स्थापन केली. पण कोणत्याही वस्तीगृह संस्थेचे ते पदाधिकारी बनले नव्हते. मुस्लिम समाजाबद्दल मात्र त्यांनी अपवाद केला. त्यांच्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्षपद महाराजांनी स्वीकारले. मुस्लिम समाजात शिक्षणाची जनजागृती व्हावी आणि त्यांच्यातील मागासलेपण दूर व्हावे,  ही खरी तळमळ महाराजांच्या या कृतीमागे होती. याच तळमळीतून मुस्लिम बोर्डिंग सुरू करण्यात आले. चौफाळ्याच्या माळावर मराठा बोर्डिंगजवळच मुस्लिम बोर्डिंगसाठी जागा देण्यात आली. बोर्डिंगच्या इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी महाराजांनी दिली. मराठा बोर्डिंगपेक्षा अधिक दान मुस्लिम बोर्डिंगसाठी महाराजांनी दिले. मुस्लिम हा मागास समाज सुधारणाक्षम व्हावा हाच उद्देश या मागे होता. 

संस्थानातील मुस्लिम देवस्थानांचे उत्पन्न या बोर्डिंगच्या संस्थेला जोडण्यात आले. बोर्डिंगची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून महाराजांनी हुकूम काढला की हातकणंगले, कसबा, रूकडी येथील दर्ग्यांचे उत्पन्न एज्युकेश सोसायटीकडे जमा करावे. अशाच प्रकारे कोल्हापूर शहरातील बाराईमाम, निहाल मशीद, बाबुजमाल देवस्थान आदींचे उत्पन्नही मुस्लिम बोर्डिंगकडे वळवण्यात आले.

धर्म बाजूला ठेवला तर मुसलमान हे बहुजनांनापेक्षा; विशेषत: मराठ्यांपेक्षा वेगळे नाहीत, असे महाराजांचे मत होते. मुस्लिम समाज कोणी परका नसून तो आपल्याच समाजाचा एक भाग आहे, हे समाजात रुजवण्याचे अनेक प्रयत्न शाहू महाराजांनी केले. धर्मग्रंथातील उपदेशाचे आकलन सामान्य मराठी मुस्लिमांना व्हावे व धर्मसुधारणा व्हावी यासाठी  महाराजांनी 'कुराण' या  पवित्र धर्मग्रंथाचे मराठी भाषांतर करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कोल्हापूर दरबाराकडून पंचवीस हजार रुपयांची तरतूद केली. महाराजांनी वसवलेल्या शाहूपुरी या पेठेत मुस्लिम बांधवांना प्रार्थना करण्यासाठी त्यांनी मशिदही बांधून दिली.

शाहू महाराजांनी संस्थानातील मुस्लिम जनतेवर प्रेम तर केलेच परंतु देशभरातील मुस्लिम प्रतिभावंतांना राजाश्रय देखील दिला. यामध्ये शाहीर हैदर, चित्रकार आबालाल रहिमान, ख्यातनाम गायक अल्लादिया खाँसाहेब तसेच महाराजांना मल्लविद्येचे धडे देणारे बालेखान वस्ताद हे प्रमुख होते. महाराजांनी अल्लादिया खाँसाहेब यांचे पुत्र भूजींखाँ यांची अंबाबाई मंदिरात गायनासाठी नेमणूक केली होती. भूजींखाँ सारख्या गायकाची अंबाबाई मंदिरात केलेली नेमणूक हा केवळ कलेच्या क्षेत्रातील प्रयोग नव्हता तर हिंदु - मुस्लीम सद्भावना वाढविण्याच्या दिशेने महाराजांनी जाणिवपुर्वक टाकलेले पाऊल होते.

शाहू महाराज मल्लविद्येचे चाहते होते. ते स्वतः एक कसलेले मल्ल होते. कुस्तीवर त्यांनी अफाट प्रेम केले. आखाडे, तालमी त्यांनी उभारल्या. देशभरातील हिंदु मल्लांसह अनेक मुस्लिम मल्लांनाही त्यांनी आपल्या संस्थानात राजाश्रय दिला होता. या मल्लांच्या खुराकाची व्यवस्था ते स्वत: पाहायचे. नावावरून मल्लांची जात धर्म लक्षात येऊ नये म्हणुन अनेक मल्लांचे महाराजांनी नामांतर केले होते. 

देशभरात कुठेही जातीय दंगली पेटल्या तरी करवीर संस्थान मात्र शांततेत नांदायचे. गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही सण एकाच वेळी येत, तेव्हा कोल्हापुरात तालीम यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती व मोहरमचे पंजे एकत्र बसवले जात. ही परंपरा आजही कायम आहे. कोल्हापुरने हिंदू-मुस्लिम सद्भावनेचा आदर्श टिकवून धरला याचे श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जाते.

अलीकडे हिंदू – मुस्लिम सलोखा बिघडवण्याची होत असलेली कृती शाहू विचारांना छेद देणारी आहे. धर्म, जातीवरून पसरवल्या जाणाऱ्या द्वेषाला रोखण्याचे काम शाहू महाराजांचा विचारच करू शकतो. धर्म व जाती भेदाच्या कलुषित राजकारणावर शाहू महाराजांचे कार्य, भूमिकाच रामबाण औषध ठरू शकते याची जाणीव आज पावलोपावली होत आहे.

- मतीन शेख, कोल्हापूर
(लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे संशोधक आहेत )