गाझियाबादच्या दासना मंदिराचे प्रमुख पुजारी यती नरसिंहानंद यांच्यावर 29 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या एका कार्यक्रमात इस्लामविरोधी वक्तव्ये केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम हिंदी भवन, लोहिया नगर येथे आयोजित करण्यात आला होता, जिथे नरसिंहानंद यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषण दिले होते.
कसा दाखल झाला गुन्हा ?
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी स्वतःहून दखल घेतली आणि गुन्हा नोंदवला. तक्रारदार पोलिस उपनिरीक्षक त्रिवेंद्र सिंह यांनी ही तक्रार दाखल केली, ज्यावर आधारित एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली नरसिंहानंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, ज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांच्या संदर्भातील कायदे अंतर्भूत आहेत. याशिवाय अजमेर दर्ग्याच्या अंजुमन सैयद जादगानचे उपाध्यक्ष सैयद कलीमुद्दीन चिश्ती यांच्या नेतृत्वाखाली खादिमांनी दर्गा पोलिस ठाण्यात जाऊन यती नरसिंहानंद यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि एफआयआर नोंदवली.
ऑल इंडिया सूफी सज्जादानशिन कौन्सिलचे सचिव गुलाम नझमी फारूकी यांनीही या प्रकरणी तक्रार दाखल केली. नरसिंहानंद यांनी हेट स्पीच करत पैगंबर मोहम्मद यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. फारूकी यांनी नरसिंहानंद यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
जमीअत उलेमा-ए-हिंदची मागणी
जमीअत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहून यती नरसिंहानंद यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या पत्रात मदनी यांनी असे म्हटले की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात धार्मिक तेढ वाढवली जाते आणि शांतता धोक्यात येते. यापूर्वीही नरसिंहानंद यांच्यावर विविध धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांसाठी गुन्हे दाखल झाले आहेत.
मुस्लिम राष्ट्रीय मंचचीही टीका
मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. शाहिद अख्तर यांनी यती नरसिंहानंद यांच्या विधानाची तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, "अशा अपमानजनक वक्तव्यांमुळे फक्त मुसलमानांच्याच नाही, तर संपूर्ण भारतीय सौहार्दाच्या संस्कृतीला ठेच पोहोचते. द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींना कठोर शिक्षा मिळायला हवी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे विधान करण्याचे धाडस करू शकणार नाही." त्यांनी पुढे असेही सांगितले, "धर्माच्या नावाखाली कोणालाही समाजात विष पसरवण्याचा अधिकार नाही. आम्ही या विकृत मानसिकतेविरोधात न्याय मिळेपर्यंत लढत राहू."
सार्वजनिक प्रतिक्रिया
या घटनेनंतर सोशल मीडियावर #ArrestNarsinghanand असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. अनेकांनी नरसिंहानंद यांच्या अटकेची मागणी केली आहे. नरसिंहानंद यांच्या विधानाचा विविध राजकीय व सामाजिक गटांनीही निषेध केला आहे. नरसिंहानंद यांची भूतकाळातील वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यांच्यावरील यापूर्वीच्या कायदेशीर कारवाया देखील चर्चेत येत आहेत.
नरसिंहानंद यांनी यापूर्वीही अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे आपत्ती ओढवून घेतली होती, ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे.