हुर्रियत चेअरमन आणि काश्मीरचे प्रमुख धर्मगुरू मीरवाइज उमर फारूक यांनी १ फेब्रुवारी २०२५ला काश्मीरमधील काश्मिरी पंडितांशी पुन्हा संवाद साधण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. दिल्लीमध्ये स्थायिक असलेले मीरवाइज उमर फारूक यांनी काश्मिरी पंडितांच्या एका गटाची भेट घेतली. यामध्ये त्यांनी काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांना सुरक्षित आणण्यासाठी ‘इंटर-कम्युनिटी कमिटी’ स्थापन करण्याची प्रस्तावना मांडली.
मीरवाइज उमर फारूक यांनी काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाची आणि जम्मू-काश्मीर पीस फोरमची (JKPF) भेट घेतली. या बैठकीत त्यांनी १९८९-९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या स्थळांतरावर चर्चा केली. या संदर्भात, मीरवाइज फारूक यांनी सांगितले की, “काश्मीरमधील सर्व समुदायांच्या दुःखाची जाणीव आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. काश्मीर काश्मिरी पंडितांशिवाय अपूर्ण आहे. काश्मिरी पंडितांची वेदना गंभीरपणे घेतली पाहिजे आणि यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले पाहिजेत.”
यावेळी, काश्मिरी पंडितांनी मीरवाइज उमर फारूक यांना त्यांचा नैतिक आणि आध्यात्मिक प्रभाव वापरून शांतता आणि समर्पणाच्या प्रक्रियेला पुढे नेण्याची विनंती केली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मीरवाइज उमर फारूक यांच्या नेतृत्वाखाली एक इंटर-कम्युनिटी कमिटी स्थापन करण्यावर सहमती व्यक्त करण्यात आली. या कमिटीमध्ये काश्मीरमधील सर्व समुदायांचा समावेश होईल. ही कमिटी काश्मिरी पंडितांना तयांच्या हक्काच्या घरात पोहचवण्यासाठी काम करेल.
या कमिटीमध्ये सरकार समर्थित पुनर्वसन उपक्रमांचा समावेश करण्याच्या उद्देश आहे. यामध्ये काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्यासाठी विशेष वसाहती तयार करण्याचा विचार करण्यात येईल. यामुळे त्यांना समाजात पुन्हा सामील होण्यासाठी सहाय्य मिळेल.
मीरवाइज उमर फारूक यांच्या या प्रयत्नांमुळे काश्मीरमधील पंडित आणि मुसलमान समुदायांच्या दरम्यान पुन्हा एकदा सौहार्दपूर्ण नातं निर्माण होण्याची शक्यता आहे. काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला जपण्यासाठी या दोन्ही समुदायांमधील प्रेम आणि बांधिलकीला महत्त्व दिले जात आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter