वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) ५०० पानी अहवाल तयार झाला आहे. या अहवालावर शुक्रवार आणि शनिवारी अशी दोन दिवस बैठक होऊन चर्चा होणार होती. मात्र काल (दि.२४) बैठकीच्या पहिल्या दिवशीच खासदारांमध्ये गदारोळ झाला. ज्यामुळे आता विरोधी पक्षाच्या १० खासदारांना समितीमधून निलंबित करण्यात आले आहे.
या खासदारांचे निलंबन...
निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवेसी, नासिर हुसैन, मोहीबुल्लाह, मोहम्मद अब्दुला, अरविंद सावंत, नदीम उल हक आणि इमरान मसूद यांचा समावेश आहे. या बैठकीत अहवालावर चर्चा होऊन ते विधि मंत्रालयाकडे दिले जाणार होते. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सदर विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
जेपीसी बैठकीत नेमके काय घडले?
भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील होत असलेल्या समितीच्या बैठकीत काश्मिरचे मीरवाईज उमर फारूकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेतलं जाणार होते. परंतु त्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला.
विरोधी पक्षाच्या खासदारांनी आरोप केला की, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप वक्फ सुधारणा विधेयकावरील अहवाल तातडीने मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये वादविवाद सुरू झाला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी, काँग्रेसचे सय्यद नासिर हुसैन हे बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर अध्यक्षांनी दहा खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केले.