छत्तीसगडमध्ये एकीकडे नक्षलवाद्यांच्या गोळीचे उत्तर गोळीनेच दिले जात असताना राज्यातील नक्षलप्रभावित भागात पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहेत. राज्यातील गेली अनेक वर्षे नक्षलवादाचा सामना करणाऱ्या विजापूर जिल्ह्यातील तिमेनार हे गाव सुमारे सात दशकांनंतर प्रथमच विजेने उजळले आहे. पायाभूत सुविधांअभावी अंधारात चाचपडणारे तिमेनार आता विकासाची वाट चालणार आहे.
गावात एवढ्या वर्षांनंतर प्रथमच वीज आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्युत प्रकाश पाहायला मिळेल, असा विचारही कधी केला नव्हता. मात्र, निराशेची जागा आता आशेने घेतली आहे, अशा शब्दांत तिमेनारचे रहिवासी मश्राम, पांडरु कुंजम आणि प्रमिला यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले, की विजेच्या आगमनामुळे भीती व असुरक्षितता संपुष्टात आली असून जीवनाचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमच्या गावात प्रथमच वीज आली आहे. आता आम्हाला रात्रीच्या अंधाराची भीती वाटत नसून आम्ही वन्यप्राणी, साप आणि विंचवाच्या भीतीपासूनही मुक्त झालो आहेत. आमची मुले सहजपणे अभ्यास करू शकतील. अखेरीस आम्हाला विकासाच्या मार्गावर आल्यासारखे वाटत आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
छत्तीसगड सरकारच्या निवेदनानुसार गावात रस्ते, आरोग्यसेवा आणि शैक्षणिक सुविधांचेही बळकटीकरण केले जात आहे. नक्षलप्रभावित भागातील प्रत्येक मांजरा-टोलाचे (वस्ती) विद्युतीकरण करून विकासाला चालना देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी दिली.
ते म्हणाले, की एकेकाही नक्षलवाद्यांच्या भीतीची दाट छाया असणाऱ्या या भागात आता विकासाची किरणे चमकत आहे. हे परिवर्तन हाच खरा विजय आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसेपासून मुक्त होत बस्तर भाग आता समृद्धी आणि प्रगतीची वाट चालत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी योजना आखून अनेक फायदे दिले जात आहेत. मात्र शरणागती न पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या कारवाया अजिबात सहन केल्या जाणार नाहीत. त्यांच्याविरुद्ध मोदी सरकार कठोर कारवाई करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले होते. देश ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलमुक्त करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. छत्तीसगडमध्ये यावर्षी आत्तापर्यंत ११३ नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे. त्यापैकी ९७ नक्षलवादी बस्तर भागातील आहेत.
याविषयी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "तिमेनारमध्ये सात दशकांनंतर होणारे विद्युतीकरण बस्तरच्या दुर्गम भागात सुशासन आणि विकासाच्या नवीन युगाची सुरुवात दर्शविते. मुख्यमंत्री मांजरा-टोला (वस्ती) विद्युतीकरण योजनेतंर्गत स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर प्रथमच भैरमगड तालुक्यातील बेचपाल ग्रामपंचायतीचा विस्तार असलेल्या गावातील सर्व ५३ घरांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. या लक्षणीय कामगिरीतून या भागातील नक्षलवाद्यांच्या दहशतीचा अंत, विकास, शांतता आणि समृद्धीची पहाट उजाडल्याचे सूचित होते."