आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार असून आज अर्थमंत्री मोदी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार करणार आहेत. आजच्या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांना देशाला भक्कम बजेट देण्याचे आश्वासन देत देश वेगाने पुढे जात असल्याचे सांगितले.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
"आज श्रावणातील पहिला सोमवार. या शुभदिनी एक महत्त्वाचे सत्र सुरू होत आहे. मी देशवासियांना श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा देतो. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आज संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. हे एक सकारात्मक अधिवेशन व्हावे," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच "६० वर्षांनंतर एखादे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येते आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळतो ही अभिमानाची गोष्ट आहे. उद्या आपण जो अर्थसंकल्प सादर करणार आहोत तो अमृतकालचा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे. आम्हाला पाच वर्षांची संधी मिळाली आहे, हा अर्थसंकल्प त्या पाच वर्षांसाठी आमची दिशा ठरवेल. हा अर्थसंकल्प २०४७ पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नांना बळ देईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज मी विरोधी पक्षाच्या खासदारांनाही आवाहन करू इच्छितो की, गेल्या जानेवारीपासून आपण जितकी क्षमता होती तितका लढा दिला. जनतेला जे काही सांगायचे होते ते मी सांगितले. पण आता ती वेळ संपली आहे. देशवासीयांनी आपला निकाल दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांचे कर्तव्य देशातील जनतेसाठी आहे. आता पक्षापेक्षा देशासाठी लढण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे.