जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चार दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जयपूर हायकोर्टाने चार दोषींचा मृत्यूच्या शिक्षेचा निकाल बदलला आहे. ट्रायल कोर्टाने चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
उच्च न्यायालयाने सर्व पुरावे फेटाळून लावत चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर चार दोषींचे वकील सय्यद अली म्हणाले की, हा न्यायाचा विजय आहे. गेली १६ वर्षे आम्ही न्यायासाठी लढत होतो. आता ही आमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे.
२०१९ मध्ये,जयपूर बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना, कनिष्ठ न्यायालयाने ४ आरोपी मोहम्मद सैफ, सैफुर रहमान, सरवर आझमी आणि मोहम्मद सलमान यांना या प्रकरणात दोषी ठरवले होते. न्यायालयाने आरोपींना यूएपीएच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवले. तसेच एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण ५ आरोपी होते.
शिक्षा सुनावताना कनिष्ठ न्यायालयाने स्फोटामागे जिहादी मानसिकता असल्याचे म्हटले होते. ही मानसिकता इथेच थांबली नाही. यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीतही बॉम्बस्फोट झाले. न्यायालयाने चौघांना खून, देशद्रोह आणि स्फोटक कायद्यांतर्गत दोषी ठरवले होते.
१३ मे २००८ रोजी जयपूरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण शहर हादरलं होतं. या बॉम्बस्फोटात ७१ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बरीच वर्षे लढा सुरू होता. ज्यामध्ये राजस्थान उच्च न्यायालयाने स्फोटाशी संबंधित चारही दोषींना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता देखील केली आहे. विशेष न्यायालयाने २० डिसेंबर २०१९ रोजी या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती.