काश्मीरमध्ये 'अशी' साजरी झाली रामनवमी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 h ago
रामनवमीनिमित्त श्रीनगरमध्ये काढलेली भव्य मिरवणूक
रामनवमीनिमित्त श्रीनगरमध्ये काढलेली भव्य मिरवणूक

 

श्रीनगरमध्ये यंदा काश्मिरी पंडित समुदायाने रामनवमीचा सण मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने आणि एकजुटीने साजरा केला. धार्मिक आस्था आणि सामाजिक समरसतेचा हा उत्सव खास ठरला. याची सर्वात मोठी झलक कथलेश्वर मंदिर, टंकीपोरा येथून निघालेल्या भव्य शोभायात्रेत दिसली. या यात्रेने संपूर्ण शहराला अध्यात्मिक ऊर्जेने भारून टाकलं.

कथलेश्वर मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात
प्राचीन कथलेश्वर मंदिरातून सकाळी सुरू झालेली ही शोभायात्रा श्रीनगरमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरून गेली. हब्बाकदल, लाल चौक, बर्बर शाह आणि जहांगीर चौक अशा मार्गांवरून प्रवास करत ती पुन्हा कथलेश्वर मंदिरात येऊन थांबली. रामभक्तांनी सजलेली ही यात्रा भजन, कीर्तन आणि धार्मिक घोषणांनी दुमदुमली. संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक आनंद पसरला.
 

 
लहान मुले आणि तरुणांचा विशेष सहभाग
पारंपरिक काश्मिरी वेशभूषेत नटलेली लहान मुलं हातात श्रीरामाच्या मूर्ती घेऊन शोभायात्रेत सामील झाली. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत श्रद्धेचा भाव उमटला. तरुण, महिला आणि वृद्धांनी एकत्र येऊन या सणाला समुदायाचा उत्सव बनवलं.

मंदिरांची सजावट आणि पूजा
शोभायात्रेच्या मार्गावरील मंदिरं, विशेषतः बर्बर शाह येथील राम मंदिर आणि दुर्गा नाग मंदिरात विशेष पूजा आणि आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. फुलं, रंगीबेरंगी दिवे आणि पारंपरिक सजावटीने ही मंदिरं नटवली गेली होती. यामुळे धार्मिक वातावरणाला अधिकच आकर्षक रूप प्राप्त झालं.

 
धार्मिक एकतेचं उदाहरण
यंदाची रामनवमी केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती धार्मिक सौहार्दाचं प्रतीकही ठरली. स्थानिक मुस्लिम समुदायातील काही लोकांनीही या आयोजनात भाग घेतला आणि काश्मिरी पंडित बांधवांसोबत सणाचा आनंद साजरा केला. काश्मीर खोऱ्यातील गंगा-जमुनी संस्कृतीचं हे जिवंत चित्र होतं.

सुरक्षेची कडक व्यवस्था
या शोभायात्रेच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि सुरक्षा दलांची संपूर्ण मार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रीनगर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखत श्रद्धाळूंना सुरक्षित आणि अखंडित यात्रेचा अनुभव दिला.

 
हिंदू वेलफेअर सोसायटी ऑफ कश्मीरचे अध्यक्ष चुन्नी लाल यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल प्रशासन आणि समाजाचे आभार मानले. ते म्हणाले, “रामनवमी हा सण फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर काश्मिरी पंडित समुदायाच्या श्रद्धा, संकटांवर मात करण्याची ताकद आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक आहे. हा उत्सव आम्हाला आमच्या सांस्कृतिक वारशाची आणि एकतेची आठवण करून देतो.”

एकता आणि आशेचा संदेश
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांची पुन्हा स्थिर होत असलेली उपस्थिती लक्षात घेता, अशा आयोजनांचं महत्त्व आणखी वाढतं. हे उत्सव समुदायाच्या सांस्कृतिक ओळखीला बळकटी देतातच, पण भविष्यातील एकता आणि आशावादाचा पायाही घालतात.

 

रामनवमीच्या या शोभायात्रेने श्रीनगरला धर्म, संस्कृती आणि बंधुभावाच्या सुंदर मिलनात रूपांतरित केलं. हा उत्सव काश्मिरी पंडित समुदायासाठी भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरला. शिवाय, समाजात सौहार्द, सहअस्तित्व आणि एकत्र राहण्याच्या मूल्यांना बळकटी देणारा हा सण ठरला.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter